शिर्डी -राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी,
राज्य शासनाच्या आदेशाने आज दिनांक १६ नोव्हेंबर पासून पहाटेच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून दिवसभरात सुमारे ०८ हजार २९० साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
श्री.बगाटे म्हणाले, जगभरात, देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शासनाने दिनांक १६ नोव्हेंबर पासून पाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच अजुन कोरोना व्हायरसचे सावट संपले नसुन साईभक्तांना श्रींचे दर्शन सुलभरित्या व्हावे तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्याची व्यवस्था आदी उपाययोजना संस्थानच्या वतीने करण्यात आल्या. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गेट नंबर ०२ मधुन प्रवेश देवुन व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे ०५ नंबर गेटव्दारे बाहेर जाणे असा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला. लॉकडाऊननंतर सुमारे ०८ महिन्याने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आल्यामुळे भक्तांच्या अतिउत्सहामुळे दिवसभरात ०८ हजार २९० साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी पंच्यक्रोशितील भाविकांचा मोठयाप्रमाणात सहभाग होता. तर मंदिर व मंदिर परिसरासह दर्शन रांगेत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
आज पहाटे काकड आरतीनंतर साईभक्तांना गेट नंबर ०२ मधुन श्रीं च्या समाधी मंदिरात दर्शनाकरीता प्रवेश देण्यात आला. तसेच श्री साईप्रसादालयात साईभक्तांकरीता भोजन प्रसाद सुरु करण्यात आले. आज दिवसभरात सुमारे ३ हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. याठिकाणी प्रसाद भोजन घेण्यासाठी आलेल्या प्रथम ०५ साईभक्तांचे व दुपारी १२.०० वाजता श्रीं च्या माध्यान्ह आरतीकरीता प्रथम १० शिर्डी ग्रामस्थांचे व १० साईभक्तांचे पारंपारिक वाद्यांसह पुष्प वृष्टी करुन स्वागत करण्यात आले. तर साईभक्तांव्दारे देणगी कार्यालयात सुमारे ०२ लाख ५० हजार रुपये देणगी प्राप्त झाली असल्याचे श्री.बगाटे यांनी सांगितले.
श्री साईबाबांचे मंदिर खुले झाल्यामुळे व संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत साईभक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना यशस्वीपणे नियोजन करण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्नशिल आहेत.